3/22/2010

जनी निंद्य ते सर्व सोडोनी द्यावे...

मला लहानपणी रामदास स्वामींचं जाम कुतुहल वाटायचं. त्याचं एकमेव कारण म्हणजे ' ते लग्नमंडपातून 'सावधान' हा शब्द ऐकल्यबरोबर पळून गेले होते' ही त्यांची ऐकलेली कथा. 'लग्नात पळून जाण्यासारखं काय?' असं वाटायचं. आता स्वतःच तसं करावे लागेल की काय? असे वाटून उगाच रामदास स्वामींबद्दलचा आदर वाढतो. अर्थात अजून दिल्ली दूर आहे. असो, विषयांतर झालं. पुढे शाळेत असताना त्यांचे मनाचे श्लोक पाठ केले, आणि पाठांतर स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवल्यावर तर रामदास स्वामी अगदी 'फेव्हरेट' झाले. मग वडिलांकडून त्यांची आणि शिवाजी महाराजांची 'खडक फोडिता रोडकी। निघे तयातून एक बेडकी॥ सिन्धू नसता तियेचे मुखी पाणी कोण घालितो। तो राम आम्हाला देतो॥' ही गोष्ट ऐकली. आणि मग पु.लं. कडून 'हरितात्यां'च्या तोंडून 'आई, चिंता करितो विश्वाची' ऐकलं आणि रामदास ही व्यक्ती पुरती डोक्यात भिनली.
रामदास स्वामींची एवढी प्रस्तावना देण्याचं कारण म्हणजे, आज सहजच, म्हणजे अगदी सहज, काही संंबंध नसताना मला, "जनी निंद्य ते सर्व सोडोनी द्यावे। जनी वंद्य ते सर्व भावे करावे॥' ह्या ओळी आठवल्या. मग असंच विचारचक्र फिरायला लागलं. रामदास स्वामींसारखा माणूस जो स्वतः प्रस्थापित समाजाचे संकेत सोडून संन्यस्त झाला, तो लोकांना मात्र 'जनी निंद्य' ते न करण्याचा आणि 'जनी वंद्य' ते 'सर्व भावे' करण्याचा का सल्ला देतोय. की रामदास स्वामींचा त्याकाळच्या माणसांवरून विश्वास उडाला होता? ज्यामुळे ते त्यांना नाकासमोरच चालण्याचा सल्ला देत होते. सामान्य माणसांमधली असामान्य बनण्याची क्षमताच नष्ट करू शकणारा हा श्लोक वाटतो. 'जनी' च्या ऐवजी 'मनी' असतं तर बरं झालं असतं का? की मग ते ओशोचं तत्वज्ञान झालं असतं?
अर्थात पुढे 'मना वासना दुष्ट कामा न ये रे..' वगैरे आहे, पण हे 'जनी निंद्य' मला भलतंच खटकतंय. काही कळत नाही, लहानपणापासून हजारो वेळा ऐकलं असेल हे, पण आज असा जो विचार येतोय, तस कधीच आला नाही. माझा विचार चुकीचाही असेल, कारण एवढ्या मोठ्या माणसाच्या श्लोकाचा कदाचित मी योग्यं अर्थ लावू शकत नसेन. पण मला तो पटत नाहीये हे मात्र खरं.
असो. आता स्वामीचं बाकी साहित्य वाचणं भाग आहे, खरा अर्थ जाणून घेण्यासाठी. पण कुणाला वेगळा अर्थ लागत असल्यास जरूर सांगा.
बाकी तोपर्यंत मी 'चिंता करितो विश्वाची!'

3/14/2010

ये दुनिया क्या दुनिया है, ये चक्कर क्या है सारा?

बर्‍याच वर्षांपूर्वी एक तद्दन गल्लाभरू आणि कुठल्यातरी इंग्रजी सिनेमावरून ढापलेला चित्रपट आला होता, 'अंगारे'. आता इंग्रजी चित्रपटावरून ढापलेला म्हटलं की तो भट्ट कंपनीचा असल्याचा संशय तुम्हाला आलाच असेल. तर तुमच्या संशयाची मी पुष्टी करतो. आता एवढं जाणलंच आहे तुम्ही, तर तुमच्या ज्ञानात अजून थोडी भर घालतो. ह्या सिनेमानंतर अजून बर्‍याच वर्षांनी आलेला 'फूटपाथ' (आफताब आणि बिपाशा) हा ह्याच भ्रष्ट सिनेमाची आणखी भ्रष्ट नक्कल होता. आता तुम्ही म्हणाल की एवढाच फालतू सिनेमा होता तर तो लक्षात का राहिला इतकी वर्षं. तर त्याचं काय आहे, त्या सिनेमामध्ये माझा आवडता नट 'अक्षय कुमार' होता (तोंड वेंगाडू नका, तो चांगला नट आहे, चुकीचे सिनेमे करतो एवढंच). पण नुसतं एवढंच कारण नाही हा सिनेमा लक्षात राहण्याचं. दुसरं कारण आहे, ह्यामध्ये तो कच्ची अंडी फोडून सरळ तोंडात ओततो, असा सीन आहे (अहो खरंच असा सीन आहे). बरं ठीक आहे, खरं सांगतो. ह्या सिनेमात एक गाणं आहे, त्यातले शब्द आहेत,
इक बात बता मेरे यारा, मैं सोच सोच के हारा। ये दुनिया क्या दुनिया है, ये चक्कर क्या है सारा॥
आता पहिल्यांदा ऐकणार्‍याला ह्यात काहीही वाटणार नाही, पण खोल विचार केला तर जाणवतं, वरवर यमक जुळवून बनवलेलं हे गाणं, चुकून (किंवा गीतकाराला खरंच असा अर्थं अभिप्रेत असेल) एक असा प्रश्न विचारतं, जो जगातल्या भल्याभल्या विचारवंतांना अनादिकाळापासून पडत आलेला आहे.
खरंच विचारवंतांना असे प्रश्न पब्लिकली पडतात, पण तुमच्या आमच्यासारख्यांना हा प्रश्न आयुष्यातल्या वेगवेगळ्या प्रसंगी पडतोच की! अगदी विश्वासातल्या माणसाने धोका द्यावा, अगदी कट्टर वैर्‍याने जीव वाचवावा, रस्त्यावर धडपडल्यावर दोन दिवसांपूर्वी हरवलेली अंगठी टपरीच्या खाली पडलेली सापडावी, आपण अगदी क्षुल्लक कारणावरून कोणावर डाफरावं आणि कुणी आपल्यावर डाफरलं की एवढा राग का येतो ह्याचं विश्लेषण करावं, दुसरा आपल्या बायकोवर फारच हुकूमत गाजवतो असं म्हणताना आपण आपल्या बायकोने कुठे कसे कपडे घालावेत हे ठरवावं आणि पुन्हा मग आपण असे का वागतो ह्याचा विचार करत राहावा, कधीकधी प्रत्यक्ष मृत्यू पाहूनही रडू न यावं आणि एखाद्या वाद्याचा आर्त सूर किंवा गायकाची दर्दभरी तान ऐकून डोळ्यात पाणी उभं राहावं, होणार्‍या बायकोने गृहकृत्यदक्ष असावं की करियर ओरियेंटेड असावं ह्याचं विश्लेषण करावं, एखाद्या शिकल्यासवरलेल्या ओळखीच्या माणसाने मुलगा इंजिनियर झाला तर एवढा हुंडा, एमबीए झाला तर एवढा हुंडा अश्या गोष्टी अगदी सामान्य गोष्टीप्रमाणे कराव्या, हुंडा दिला नाही म्हणून सुनेला जाळून टाकल्याची नेहमीचीच बातमी पुन्हा एकदा पेपरात वाचावी, रस्त्यात दिसणार्‍या प्रत्येक मंदिरासमोर आवर्जून नमस्कार करणार्‍याने ऑफिसमध्ये सहकार्‍यांना विनाकारण त्रास द्यावा, उच्चविद्याविभूषित आईवडिलांनी आपल्या मुलानं/मुलीनं निवड्लेल्या तोलामोलाच्या मुलाला/मुलीला केवळ ती जातीतली नाही म्हणून नकार द्यावा, 'देव सृष्टीच्या चराचरात आहे म्हणणार्‍याने लोकांना अस्पृश्य ठरवून मानवाला सृष्टीचा भाग मानण्यास नकार द्यावा, आधी स्वतःला चराचराहून वर समजून चरत राहावं आणि पुन्हा त्याच 'अस्पृश्य' मर्त्य मानवांना एकदा त्यांच्या देव्हार्‍यातल्या देवाला भेटण्याची 'परवानगी' नाकारावी, कुणीतरी त्याला वाटते त्या 'देवाला मानणे' हे पुण्य ठरवून देवाचे कुठलेही दुसरे रूप मानणार्‍याना देहांत शासन द्यावं (हे वेगळ्या धर्मांतच नाही एकाच धर्मांत देखील घडते आणि वेगळे रूप म्हणजे कामाला देव मानणे म्हणजेच नास्तिकसुद्धा), कुठे जातीच्या नावाखाली जळितकांड व्हावीत, कुणी धर्मप्रसाराच्या नावाखाली कंपनी वाढवण्यासारखे उद्योग करावे आणि धर्माला पैश्यांसाठी बदलून किंवा बदलवून लोकांच्या असहायतेचा फायदा घेवून आपल्या धर्माला मानणार्‍यांची संख्या एवढी वाढली असा बडेजाव मिरवावा, 'तुझा धर्म मोठा कि माझा, तुझा देव महान कि माझा' असले निरर्थक वादविवाद करावे आणि सर्वांनी ते टीव्हीवर पाहून आपापले रक्तदाब खालीवर करून घ्यावे, मधच्यामधे ह्या सर्वांचं सोयरसुतक नसणार्‍या कुणी ह्यात बक्कळ पैसे कमवावे,न्यायानं वागणार्‍यांनी देशोधडीला लागावं आणि गुन्हेगारांनी सुखासीन आयुष्य जगावं, पुन्हा देशोधडीला लागलेल्यांना त्याचं काहीच वाईट न वाटता त्यांनी हिसुद्धा एक परीक्षा समजावी आणि आनंदी रहावं आणि गुन्हेगारंनी एवढं सुखासीन आयुष्य असताना अजून संपत्तीसाठी हायहाय करावी, कुठल्यातरी मानवी गटाने दुसर्‍या गटावर आधिपत्य गाजवावं आणि त्यांची सगळी संपत्ती लुबाडावी, मग त्यांतल्याच कुणा प्याद्याला थोडी संपत्ती देउन त्या लोकांची जवाबदारी सोपवून निघून जावं मग त्या मूर्ख प्याद्याच्या ऐय्याशीमुळे त्या समूहाची अवस्था वाईट झाली की जुन्या सत्तधीशांनी चारदोन कवड्यांची मदत द्यावी आणि आढ्यतेने आपल्या महानतेचा बडेजाव मिरवावा, ह्या आणि अश्या अनेक घटनांनंतर मला ' ये दुनिया क्या दुनिया है, ये चक्कर क्या है सारा?" हाच प्रश्न पडतो.
आता मला ठाऊक आहे, तुमच्यातल्या अर्ध्याहून जास्त लोकांनी इथपर्यंत वाचलंही नसेल, पण ज्यांनी वाचलं त्यांच्यासाठी पुढे लिहितो. ह्या सगळ्या घटना प्रातिनिधिक आहेत, जगाचा पसारा एवढा आहे की आपल्यासारखी सामान्यं माणसं काय कल्पना करणार. पण ह्या घटना, मग त्याच्यामागे असलेल्या वृत्तीप्रवृत्ती, त्यामागचे उद्देश, त्यांचे परिणाम ह्या सगळ्याचा विचार एकत्र केला तर कधी थोडा मेळ बसतो, तर कधी बिलकुलच नाही, पण मग दुसरी एखादी घटना घडते आणी बसलेला मेळ उलथून जातो. सैरभैर व्हायला होतं. कदाचित सगळ्यांचंच होत असेल. माहीत नाही का, पण काल रात्रीपासूनच ह्याबद्दल लिहावंसं वाटत होतं, सुरुवात केल्यावर गाडी कुठल्या रुळावर कशी गेली ते कळलंच नाही. तुम्हाला काहीच अर्थबोध झाला नसेल तर काही हरकत नाही मी क्षमा मागतो, माझं लिखाण माझ्या विचारांना कदाचित न्याय देऊ शकलं नसेल, किंवा ह्या प्रश्नाला न्याय देऊ शकलं नसेल. पण हा प्रश्न पुन्हापुन्हा अनेकांना पडत राहिल, वेगवेगळ्या भाषांत, वेगवेगळ्या शब्दांत. पण प्रश्न तसाच राहतो आणि अनादिकाळापासून अनंतकाळापर्यंत तसाच राहणार, अनुत्तरित.

3/08/2010

म(तलबी). फि(जूल). हुसैन

काहीकाही घटना आणि त्यानंतर प्रतिक्रिया, मतमतांतरे आणि उत्तरक्रिया(!) ह्यामुळे उठणारी राळ मला आपल्या सहिष्णुतेचा असहिष्णुपणाने विचार करायला भाग पाडतात. मतलबी हुसैन आणि त्याच्याशी संबंधित सर्व बातम्या उपरोक्त सदरात मोडतात.
नग्नचित्रे हा अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा आविष्कार आहे हे जरी मान्य केले, तरी तो आविष्कार फक्त परधर्मीयांच्या देवीदेवता आणि भारतमाता(जिला नमन करणे त्यांच्या धर्मात बसत नाही) ह्यांच्याच बाबतीत प्रकटतो ही बाब पचनी पडण्यासाठी हाडाचे कलावादी हवेत. तुकाराम म्हणतात त्याप्रमाणे "तुका म्हणे तेथे पाहिजे जातीचे। येरागाबाळाचे नाही काम॥". कारण ह्या परमोच्च सौंदर्यदृष्टी लाभलेल्या कलाकाराच्या दैवी कुंचल्यातून जेव्हा इस्लामिक प्रतिमा बाहेर पडतात त्या ऊंची 'वस्तरे'(नटरंग हॅंगओव्हर) लेवूनच. आता सौंदर्यदृष्टीचा हा कोन माझ्या चौकोनी बुद्धीच्या परिघाबाहेरचा आहे. ह्या पुण्यात्म्याचा नुकताच प्रकट झालेला कलाविष्कार 'रेप ऑफ इंडिया' त्याच्या अफाट प्रतिभेची ओरडून ओरडून ग्वाही देतो. त्याचा कलाविष्काराचे स्वातंत्र्य आणि धार्मिक भावनांची कदर ह्यामध्ये समतोल साधण्यात कोणी हात धरू शकत नाही. आठवा, 'मीनाक्षी' चित्रपटातील 'नूर-उन-अल्लाह' गाण्यावर मुस्लिम बांधवांनी घेतलेल्या आक्षेपानंतर बिनशर्त गाणे काढून टाकण्याची त्याची सामाजिक भान ठेवून केलेली कृती.
असो. तर सध्या तमाम बुद्धिवादी, कलावादी, सौंदर्यवादी, बुटाची वादी, लेंग्याची वादी दुःखी आहेत कारण हा महान, भूलोकीचा संत (बलात्कारित)भारतमातेतील तिच्या काही अजाण लेकरांनी कोर्टात दाखल केलेल्या खटल्यांमुळे, तिच्या मूठभर वाद्यांच्या असतील, नसतील तेवढ्या वाद्या सोडून, कलेची कदर असणार्‍या 'शरिया' कायद्याने चालणार्‍या सौंदर्यवादी राज्यात चाललाय. मराठी माणसं मात्र त्याची कदर करतात. माधुरी दिक्षीत, श्रेयस तळपदे ह्यांच्यासारखे कलावंत तर त्या पुण्यात्म्याच्या गळ्यातले ताईत. त्याच्या जाण्याने ह्या सगळ्या उपरोक्त वाद्या अगदी 'सुटल्यात'. पण दुर्दैवाने मी बटण किंवा बक्कल वापरत असल्याने माझ्या संवेदना बोथट झाल्या आहेत. जर तसं नसतं तर जेव्हा एक उपरोक्त वादी एका अग्रलेखात ' तस्लिमा नसरीनचा कळवळा असलेल्या हिंदुत्ववादी संघटना हुसैनसाहेबांच्या बाबतीत दुटप्पीपणा करतात.' असं म्हणते, तेव्हा सामाजिक अपप्रवृत्तीवर प्रहार आणि नग्नचित्रे ह्यामध्ये साम्य काय, असला बेअकली प्रश्न मला पडलाच नसता. आणि 'सावरकरांच्या मार्सेलिस (खरा उच्चार मार्से) इथल्या पुतळ्याबाबत केन्द्र सरकार उदासीन' असल्या फालतू मथळ्याने दुःखी होणार्‍या मला ' हुसैन यांनी भारताचा पासपोर्ट परत केला' ह्या मथळ्याचं काहीच वाटू नये. छे, छे! माझं काही खरं नाही. आमच्यासारख्या अ-कलावाद्यांमुळे(महाराष्ट्र टाईम्स च्या सौजन्याने आम्ही कसलीतरी वादी झालो एकदाचे) बलात्कारित भारतमाता तिचे कपडे काढणार्‍या एका सुपुत्राला मुकली. आमच्या नशीबी 'नूर-उन-अल्लाह' नाहीच, आम्ही 'जहन्नुम' च्याच लायक आहोत.